Feed me soul full: food in illness.

पथ्य कल्पना पथ्य अन्न :(आजारपणात अन्न)
पथ्य अन्न हि आयुर्वेदातील एक खूप वेगळी आणि एकमेव विचारधारा आहे.
जेंव्हा पचनशक्ती मंदावलेली असते,व्याधी झालेले असतात तेंव्हा अर्थातच शरीर नेहमीप्रमाणे अन्न पचवू शकत नाही. किंबहुना अशा वेळेस खाल्ले गेलेले चुकीचे अन्न व्याधी वाढवण्यास च कारणीभूत होऊ शकते.
मंदावलेला पाचक अग्नी हळू हळू सामान्य होईस्तोवर किंबहुना तोच सामान्य व्हावा या करीत काही विशीष्ट अन्न सेवन केले जाते यासच पथ्य असे म्हणतात.

पथ्य शब्दाचा शब्दशः अर्थ पथावर आणणारा तोच पथ्य. शरीरातील वात,पित्त,कफ दोष जे आजारपणात आपली आपली वाट किंवा पथ सोडून शरीरात वेगवेगळे व्याधी निर्माण करतात अशा दोषांना सरळ करणारा,पथावर परत घेऊन घेणारा आहार,अन्न म्हणजे पथ्य होय.

आजारपणात लंघन म्हणजे न खाणे अथवा अतिशय अल्प प्रमाणात काही विशिष्ट पदार्थ च खाणे अपेक्षित असते. अशा वेळी नेहमीच्या जेवणातील ,नाश्त्याच्या पदार्थातील काही पदार्थ निश्चित खाता येणार नाही.
आश्चर्य वाटेल परंतु हि खूप साधी गोष्टही बऱ्याच लोकांच्या गावीही नसते.ताप असो,अशक्तपणा असो,अजीर्ण असो जुलाब असो बरेचदा नेहमीप्रमाणे नाश्ता जेवण घेणारे लोक,पेशंट मी पहिले आहेत. जुलाबामुळे पोटात आग पडल्यासारखी वाटतेय असे पेशंटने सांगितल्यावर गार आईस्क्रीम खा असा सल्ला आजूबाजूचे देतात आणि ती व्यक्ती तर त्या सल्य्याची जणू वाटच बघत असते.

एवढेच कशाला मोठमोठ्या हॉस्पिटल मध्ये खरे तर या गोष्टीवर विचार व्हायला हवा. तेथील कॅन्टीन मधून देखील सरसकट सगळ्या पेशंटना बरेचदा सारखाच नाश्ता दिला जातो. कार्बोहैड्रेट,प्रोटीन, प्रोबियॉटिक,कॅलरी आणि शुगर फक्त या गोष्टीभोवतीच सगळे आहारशास्त्र बसवणे कितपत योग्य आहे हा विचार करण्याजोगा मुद्दा आहे.
आजारपणानंतर शरीरातील जल,मांस,अस्थी, या धातूंची(पेशींची) हानी भरून काढायची असते.परंतु हि हानी भरून काढताना खाल्लेले अति पौष्टिक पदार्थ आतडयातून नीट शोषले जाऊन त्या त्या धातूंपर्यंत पोचायला तर हवे ना? एकदम भरपूर तेल ओतले तर ठिणगी विझते आणि तेल ओतले नाही तरी ठिणगी विझते. शरीरातील पाचकाग्नीचे असेच असते. एकदम प्रमाणाबाहेर घेतलेला आहार आजारपणात ठिणगी सारख्या दुर्बल झालेल्या पाचकाग्निला विझवतो किंवा अगदी उलट हवे तेवढे पोषण लगेच नाही मिळाले तरी ते आरोग्याला वाईट.
आजारपणात सर्वात आधी जीवनसत्त्वांची आणि प्रथिनांची हानी भरून निघणे गरजेचे असते. त्यातही प्रथिने पचायला जड असतात.त्यामुळे उत्तम जीवनसत्वांचा स्रोत असलेल्या तसेच पचायला सोपे प्रथिने अशी योजना करावी लागते.
फळे हा जीवनसत्वांचा उत्तम सरोत होय.परंतु फळांची निवड हि जपून करावी लागते.
डाळिंब,काळ्या मनुका,काळी द्राक्षे,मोसंबी, शहाळ्याची कोवळी मलाई(खोबरे),ह्या फळांच्या रसयुक्त ह्या गुणामुळे तसेच मधुर आम्ल रसांमुळे लगेच तरतरी येणे,भूक आणि पाचकरस योग्य स्रवणे,असे फायदे त्वरित मिळतात.थोड्या थोड्या प्रमाणांत अशी फळे जवळपास सर्वच आजारपणात सुरु करता येतात.फळांचे बाजारात मिळणारे रसाचे (ज्यूस) कॅन,टेट्रा पॅक शक्यतो अजिबातच वापरू नये. कारण अर्थातच अतिप्रमाणात साखर,कृत्रिम चवी,रंग आणि टिकवण्यासाठी वापरलेली रसायने.
पपई,ताजे अंजीर,पचवण्याची ताकत वाढली असेल तर वेलची केळ,क्वचित सफरचंद असे फळे भुकेचा अंदाज घेऊन खावे.शक्यतो त्या ऋतूत उपलब्ध फळांनाच प्राधान्य द्यावे.
विशेषतः उन्हाळ्यात टरबूज,खरबूज, आजारी माणसाला देताना काळजी घ्यावी. बरेचदा फळेच बाधून अजून त्रास वाढण्याची शक्यता असते.व्यक्ती पूर्ण बरा झाल्यावर पचनशक्ती सामान्य झाल्यावर,शरीरातील दोषांची स्थती सामान्य झाली कि इतर सर्व फळे खाण्यास हरकत नाही.
सुकी फळे किंवा सुका मेवा हि तिसरी पायरी असावी कारण आता पचवण्याची क्षमता वाढलेली असते आणि सुक्या मेव्यातील पोषकतत्वे नीट शोषली जाऊ शकतात. सुके अंजीर,अक्रोड,बदाम,जर्दाळू,बेदाणे,पिस्ता,काजू हे एकत्र खाणे योग्य. हे जीवनसत्वे अ,ब,क ,लोह,फॉलिक ऍसिड,प्रथिने काही प्रमाणात कॅल्शियम असे सर्वंकष पोषक पॉवर पॅक फूड होय.

पचायला जड उसळी आजारपणात किंवा आजारपणांनंतर एकदम सुरु करू नये.त्याऐवजी डाळींचे कढण त्यातही हिरवे मूग डाळ,मसूर डाळ,कुळीथ,पिवळे मूग डाळ अश्या डाळींचे आले लसूण जिरे,लवंग दालचिनी,ओलंखोबरे ,सैंधव,आमसूल घालून नीट शिजवलेले पातळ कढण साजूक तूप घालून सुपाप्रमाणे द्यावे. हे पचायला सोपे आणि प्रथिनांची गरज उत्तम सांभाळणारे खूप उपयुक्त पथ्य होय.हे कढण आणि मऊ शिजलेला भात तूप मेतकुटाबरोबर हे आजारपणात दुपारचे जेवण म्हणून देऊ शकतो.एखादा नाचणी अथवा पोह्याचा छोटा पापड तोंडी लावायला उपासाचे साधे लोणचे असले कि पेशंटचा चेहराहि खुलतो.

नेहमीचे पोळी,कुठलीही भाजी ,कोशिंबीर,सँडविच ,ऑम्लेट, असे पदार्थ आजारपणात नीट पचवले जात नाही.नेहमीचे जेवण जेवायची इच्छाही नसते. वर सांगितलेला साधा ताजा आहार रुग्णास चविष्ट वाटतो.

पडवळ,भेंडी,घोसाळे,लाल भोपळा या भाज्या नीट शिजवून सरबरीत तर ,चाकवत, राजगिरा,लाल माठ,अंबाडी या भाज्या नीट शिजवून पातळ स्वरूपात तांदुळाची ,ज्वारीची भाकरी याबरोबर भूक वाढल्यांनंतर सुरु कराव्या. कडधान्ये उसळी स्वरूपात न देता कढणाच्या पातळ स्वरूपातच सुरुवातीस सुरु करावीत.गोड ताजे दही, तूप घातलेल्या मऊ भातावर दुपारच्या जेवणात घ्यावे.सैंधव घातलेले ताक हि सुरु करावे.

संध्याकाळी भूक लागल्यास आजारपणात किंवा आजारपणानंतर काही दिवस राजगिरा लाह्या ताकाबरोबर,साळीच्या लाह्यांचा तुपाची फोडणी देऊन चिवडा,वर उल्लेख केलेली फळे, नाचणी सत्व किंवा लापशी, तांदुळाचे पातळ मऊ धिरडे, कमी दूध घातलेली नाचणी,हळीव, किंवा तांदळाची खीर असे पदार्थ पसंतीस असावे. टोस्ट,ब्रेड,खारी, बिस्किटे,वेफर,चहा कॉफी असे पदार्थ टाळावे. सातूचे पीठ देखील आजारपणानंतर खाणयासाठी एक चविष्ट बल्य पदार्थ आहे.

हळू हळू पोळी भाजी,खिचडी,पराठा,असे सामान्य आहार पदार्थ सुरु करावे. कधी आणि किती दिवसांनी याचा अंदाज भूक लागणे,खाण्याचे प्रमाण आणि पॉट साफ होणे यावरून लावता येते.योग्य तेंव्हा अर्थातच योग्य व्यक्तीकडून आहारसल्ला घेणे फायदेशीरच ठरते.
आजारपणात किंवा आजारपणानंतर काही दिवस मांस किंवा नॉनव्हेज पदार्थ ग्रेव्ही,कबाब,तळलेले या स्वरूपात अजिबात खाऊ नये. आयुर्वेदात मांसरस म्हणजे नॉन व्हेज सुपाचा उल्लेख होय. हा मांसरस आजारपणात दौर्बल्य कमी करण्यातील उत्तम पदार्थ सांगितला आहे. बोकड्याचे मांस पाण्यात सुंठ, मिरे ,पिंपळी लवंग दालचिनी सारख्या मसाल्यांबरोबर उकळवून गाळून आजारपणात प्यायल्यास सर्व प्रकारची पेशींची हानी भरून निघण्यास मदत होते.असे सूप नॉन व्हेज खाणाऱ्यांनी अवश्य प्यावे.

आजारपणा बरोबरच घरात असलेले वृद्ध,बालक,यांचीही नाश्ता अथवा जेवणाची वेगळ्या पदार्थांची गरज असू शकते. तिथेदेखील हि पथ्य कल्पना अचूक वापरता येते.पथ्य कल्पनेचा विस्तार अजून खूप करता येण्याजोगा आहे. पुस्तकातील विषयाला आवश्यक तेवढा मांडणे योग्य राहील.आयुर्वेदात पंचकर्मानंतर चा एक आठवडा रुग्णास ठराविक पथ्याचेच पदार्थ खाण्याचा असतो .त्याला संसर्जन क्रम असे म्हणतात.सुरुवातीचे दोन दिवस कडकडीत उपास किंवा क्वचित सांगितलेले पदार्थ आणि त्यानंतर लिक्विड ,सेमिसॉलिड ते सॉलिड असा आहार योजला जातो. त्यासाठी काही वेगळे पदार्थ खास उल्लेखिलेले आहेत. जे व्यवहारात इतर आजारपणात पथ्य म्हणून आम्ही वैद्य रुग्णांकरिता वापरतो.

आयुर्वेदातील प्रमुख पथ्य अन्न जे आजारपणात किंवा नंतरही वापरता येईल.
१.पेज:
२.लापशी :पेया
३.आटवल:विलेपी
४.यवागु
५.भात(ओदन)
६.मुगाचे सार
७.कुळथाचे सार
८.लाल भोपळ्याचे सार
९.आमसुलाचे सार
१०.साळीच्या लाह्यांची पेज
११.मांसरस(non veg soup)

Share this :

4 thoughts on “Feed me soul full: food in illness.”

  1. swati bamankar_ dhage.

    kharch khup chhan lihita mam tumhi ani jo vishay amhala mahit nahi tya baddal detail madhe sangta tumhi.Thank You dear mam……

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart