उदक गाथा ! पाण्याची गोष्ट !

उदक गाथा ! पाण्याची गोष्ट !
साध्या गोष्टी गुंतागुंतीच्या करणे म्हणजे ट्रेंड! अन्नाची नको तेवढी चिरफाड आणि चर्चा परंतु निष्कर्ष बरेचदा साशंक म्हणजे dietetics. साधे सोपे ताजे परिचयाचे आणि शरीराला आणि मनाला सात्म्य असलेले अन्न आज दुरापास्त झालेय. अगदी बिचारे पाणी देखील यातून सुटले नाही. किती लिटर किंवा मिलिलिटर पाणी कसे प्यावे. पाणी पिऊन वजन कसे कमी करावे. तांब्याच्या तांबे (सॉरी बॉटल्स च्या बॉटल्स ) पाणी पिऊन शरीर आतून स्वच्छ कसे करावं अशा वाट्टेल त्या गोष्टी आज वाचायला मिळतात. दुर्दैवाने अनेक जण ब्लाईंडली त्या फॉलो करतात आणि स्वाथ्य धोक्यात आणतात. पेशंट,वाचक आणि परिचित देखील वेळोवेळी पाण्याविषयीचे सल्ले घेतात(बरेचदा देतातच).
आयुर्वेदात पाण्याविषयी साधे सरळ शास्त्रोक्त काही आहे का? अशी विचारणा कायम होत असल्यानं आजचा ब्लॉग उदकं समर्पयामि!

इंग्रजी मधील माझ्या \’वॉटर टेल्स !\’ या ब्लॉग चे हे मराठी रूपांतर.
पाणी किती प्यावे? पाणी गार प्यावे कि गरम ? जेवायच्या आधी पाणी प्यायल्याने वजन कमी होते का ? उपाशी पोटी पाणी प्यावे का ? तहान नसली तर पाणी प्यावे का? अति पाणी प्यायले तर काही त्रास होतो का? ह्या आणि इतर अनेक शंकाचे या ब्लॉग मधून निरसन व्हावे हा लेखनामागील उद्देश.

  • आयुर्वेदा मध्ये काही आंतरिक गरजा किंवा सोप्या भाषेत अर्जेस ह्या कधीहि रोखून धरू नये अशी सूचना होय. ह्यालाच शास्त्रीय शब्द आहे वेग विधारण. म्हणजे नॅचरल अर्जेस होल्ड करणे.
    तहान ,भूक, झोप ,शिंका, खोकला, ढेकर, खालून वायू सरणे ,अश्रू ,मल, मूत्र विसर्जन, वीर्य स्खलन ,उलटी आणि जांभई हे ते १३ वेग होत.
    याचा अर्थ वरील गोष्टी गरज असेल तेंव्हा योग्य वेळी पूर्ण कराव्या त्या रोखू नये. जर वरील पैकी एक अथवा अनेक वेग वारंवार रोखायची सवय असेल तर शरीरात अनेक व्याधी निर्माण होऊ शकतात.किंबहुना रोग होण्याच्या अनेक कारणांमध्ये वरील पैकी एक अथवा अनेक अर्जेस रोखणे हे महत्वाचे कारण होय.
    हा विषय देखील नक्कीच वेगळा ब्लॉग होऊ शकतो. जसे वरील गोष्टी रोखू नयेत अगदी तसेच नॅचरल अर्जेस मुद्दामहून निर्माण देखील करू नये. म्हणजे वेग आल्याशीवाय ते पूर्ण करू नये. उदा.भूक नसताना खाणे, तपकीर वापरून विनाकारण शिंका काढणे, टॉयलेट ला लागली नसताना देखील जोर देऊन कण्याचा प्रयत्न करणे ,अनैसर्गिक पद्धतीने इच्छा उत्तप्न्न करून मैथुन अथवा हस्तमैथुन करणे,घशात बोट घालून घालून उलट्या करणे इत्यादी .अगदी तसेच तहान नसताना पाणी पिणे हे देखील चुकीचे होय.
  • तहान लागली असता जर वारंवार पाणी पिणे टाळले जात असेल घशाला शोष पडणे, एकाग्रता कमी होणे, शारीरिक व मानसिक क्षमता कमी होणे, प्रचंड थकवा, चक्कर असे लक्षण दिसते. अगदी काही बाबतीत हि पाण्याची कमतरता कर्णेद्रियात देखील दोष निर्मण करते असा आयुर्वेदात उल्लेख होय.
  • तहान लागली असता पाणी प्यायलं कि त्वरित ऊर्जा मिळते, टवटवी येते, घशाचा शोष कमी होतो, अवधान उत्तम राहते ,मरगळ जाते, पाचही इंद्रिये उत्तम ज्ञान धारणा करतात. कारण त्या वेळेस जल महाभूताचीच गरज असते. शरीरात पृथी जल अग्नी वायू आणि आकाश यांच्या ताळमेळाने मेटाबोलिझम राखले जाते. तसेच तहान लागल्यावर पाणी हे च सर्वश्रेष्ठ पाण्याची जागा कोल्ड ड्रिंक ज्यूस घेऊ शकत नाही.
  • अर्थात गरज नसताना जर हे जल महाभूत म्हणजे पाणी निष्कारण वाढवले गेले तर ते हि हानिकारक होणार. कदाचित एखाद दोनदा केल्याने फारसा फरक पडणार हि नाही परंतु तहान नसताना वेळोवेळी खूप पाणी प्यायची सवय हि हार्मोनी बिघडवू शकते. तहान नसताना पाणी पिल्याने भूक मंदावणे,अजीर्ण,पोटात जड वाटणे,आळस आणि कारण न सापडणारी अंगावरील सूज अशी लक्षणे दिसतात.
  • जेवायच्या आधी पाणी पिणे :
    वजन कमी करण्यासाठी काही डाएट ट्रेंड मध्ये लोक जेवायच्या आधी भूक लागलेली असताना भरपूर पाणी पितात. आपण भूक हि नैसर्गीक गरज रोखू नये. भूक लागल्यावर शरीरातील जठराग्नीला अन्न च हवे. त्या अग्नीवर पाणी ओतले तर अर्थात अजीर्ण आणि त्यामुळे पुढे अनेक पचनाचे पित्ताचे विकार निश्चित. या मुळे शरीराला नीट पोषण न मिळता जर वजन कमी होणार असेल तर ते किती भयानक आहे. अशा लोकांमध्ये केस गळणे, हाडाचे विकार, अस्थी सुषिरता हि दिसू शकते. जर भूक लागली असेल तर अन्न खावे पाण्याने ती भूक मारू नये.
  • जेवण झाल्या झाल्या तुडुंब भरलेला तांब्या सरळ उपडा तोंडात हेही चुकीचंच होय. जेवल्यावर शरीरातील यंत्रणा पचनाचे काम सुरु करते. पोटातली पाचक रस अन्नात मिसळला जाऊन त्यांचे पचन शोषण सुरु असताना अचानक जर खूप पाणी प्यायले तर पोटातील मिश्रण डायल्युट होण्याचा संभव असतो. अन्नाचा पोटातील गोळा हा मऊ बारीक करून मग पुढे जाणे अपेक्षित असतो. त्यात पाणी टाकले तर अति पातळ मिश्रण अपाचित स्वरूपात तसेच पुढे ढकलले जाण्याचा संभव असतो.

    आपण कणिक भिजवताना काय करतो हो. आधीच सगळे पाणी ओतून देतो का किंवा कणिक भिजल्यावर परत पाणी ओततो का ? नाही तर आपण हळू हळू लागेल तसे पाणी पिठात टाकतो आणि ते नीट एकत्र करून मळतो. किंवा मिक्सर मध्ये मसाला बारीक करताना आधीच पाणी टाकले तर चोथा पाणी राहतो हा आपल्यापैकी बऱ्याच जणांचा जणींचा अनुभव असेल. त्यात देखील हळू हळू लागेल तसे पाणी घातले तर बारीक एकजीव मसाला मिळतो. अगदी तसेच जेवताना मध्ये मध्ये थोडे पाणी हे उत्तम होय. याने पाणी अन्नात सारखे आणि नीट मिसळले जाते. जीभ वेळोवेळी स्वच्छ होते अन्न नीट गिळल्या जाते. असे एकजीव झालेले मऊसर अन्न जठरात अधिक सहजतेने पचवले आणि पुढील पचनासाठी लहान आतड्यात पाठवले जाते. त्यामुळे जेवताना थोडे थोडे पाणी मध्ये मध्ये पिणे उत्तम .

  • असाच एक ट्रेंड सकाळी सकाळी उपाशी पोटी लिटर लिटर पाणी पिण्याचा होय. तोही अतिशय चुकीचा होय. का आता तुम्हाला लक्षात आला असेलच . हो बरोबर रिस्पेक्ट युअर नॅचरल अर्ज बट डोन्ट क्रिएट ऑर अब्युस इट! अर्धा ग्लास कोमट पाणी वाटले तर हरकत नाही. लक्षात ठेवा वजन कमी करण्यासाठी पाणी नव्हे तर हात पाय वापरणे उत्तम.
  • गरम वातावरणातून अथवा रणरणत्या उन्हातून आल्या आल्या एकदम गार पाणी पिणे हेही चुकीचे होय. तोंडावर पाणी मारून किंवा सावलीत बसून काही वेळानंतर ते पिणे उत्तम. तापमानातील अचानक बदल शरीराला शॉक च असतो. रक्ताचे, त्वचेचे काही विकार होण्यामागे आयुर्वेदात हि विशिष्ट सवय नमूद केलेली आढळते.
  • अतिशय थंड पाणी किंवा अति गरम पाणी दोन्ही घशाचे अंतःत्वचा आणि जठराचे आतील आवरण याना उपकारक नव्हे. अतिथंड पाण्याने पचनाचे विकार, मलबद्धता होताना दिसते. पाणी असले तरी ते शरीराला पचवावे लागतेच. त्यामुळे पाणीच तर आहे कसे हि केंव्हाहि प्या असे म्हणणे थोडे बोल्ड होय.
    कॉन्स्टिपेशन वर इलाज म्हणून घटाघटा पाणी पिणे म्हणजे निव्वळ बाळबोधपणा होय. याचा टोल बरेचदा किडनी ला भरावा लागतो आणि हो कॉन्स्टिपेशन तसेच असते ,हसत दंतपंक्ती दाखवत.
    कॉन्स्टिपेशन पाण्याच्या कमतरतेपेक्षा पचनाच्या दोषातून होते. पचन आणि आतड्यातील दोष निवारणाशिवाय कॉन्स्टिपेशन वरील इलाज अशक्य.
  • बरेचदा वाचतो अथवा अभिनेत्र्या सांगतात ,भरपूर पाणी प्या आणि शरीरातले टॉक्सिन्स फ्लश करा. खरंच इतके सोपे आहे का हो. शरीर म्हणजे काय टॉयलेट आहे का कि भरपूर पाण्याचे जेट लावून आतली सगळी घाण फ्लश करता येईल. वरील सर्व मुद्दे वाचून तुम्हाला हि त्या वाक्यातील पोकळपणा आता जाणवला असेल. कमी पाणी पिणे अयोग्य आणि अवास्तव अति पाणी पिणे देखील तितकेच घातक.
  • आश्रय वाटेल , अविश्वास देखील परंतु अतिसार म्हणजे जुलाब यात अति पाणी पिण्याची सवय हे एक कारण नमूद होय. अर्थात इन्फेकशन ने होणारे जुलाब वेगळे. त्यामुळे प्रत्यके जुलाबाच्या माणसात ग्लास चे ग्लास ग्लुकोन D अथवा इतर मिश्रण देत असाल तर विचार करा. इन्फेकशन चे अतिसार सोडले तर इतर जुलाबांमध्ये अपचन हे कारण असते. अजीर्ण झाले असता काहीही न खाणे आणि कोमट पाणी पिणे हा इलाज असतो परंतु अजीर्ण वाढले, अन्न खाल्ले गेले किंवा अजीर्णाचा वेळीच उपाय केला गेला नाही तर शरीर विविध पेशींमधून ते जल घेऊन पोटातील अजीर्ण बाहेर टाकायला सुरुवात करते. व्याधीच्या ह्या अवस्थेत काळजीपूर्वक औषधी तसेच पाणी वापरावे लागते अथवा व्याधी वाढतोच.
  • किती पाणी प्यावे हे अचूक परिमाणात सांगणे अवघड होय परंतु वरील लेखातील मुद्दे यासाठी निश्चित मदत करतील. दिवस दिवस AC त बसणारे विचारतील कि आम्ही कसे करावे घाम कमी येतोच मग तहान हि कमी लागते पाणी कमी पडत असावे. ह्या लोकांमध्ये त्यांच्या किडनी घामाचे बहुतांश काम करत असतात. ह्या लोकांनी पिण्याचे पाणी कोमट ठेवणे फायदेशीर होय. तहान आणि AC चा संबंध खरेतर नाही.अगदी उन्हात जेवढी तीव्रेतेने जाणवते अथवा वारंवार लागते तशी कदाचित नाही लागणार पण ती लागणारच. ती ओळखायला शिका आणि टाळू नका.

पाणी, पाण्याच्या टिप्स, पाण्याचे असंख्य उपाय आणि पाण्यावरील अगणित गोष्टी इंटरनेट वर वाचून भुलभुलैयात अडकलेल्या ना या ब्लॉग ने किंचित दिशा मिळेल या सकारात्मक वळणावर साइनिंग ऑफ फॉर नाऊ !

Share this :

2 thoughts on “उदक गाथा ! पाण्याची गोष्ट !”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart