उपासाचे पंचपक्वानांचं ताट !!!!!!?????

उपासाचे पंचपक्वानांचं ताट !!!!!!?????
“आई, हे उपासाच्या फराळाचे ताट आहे?” विस्फारलेल्या डोळ्यांनी मी सासूबाई ना विचारत होते.लग्नानंतरच्या पहिल्याच नवरात्राच्या अष्टमीला सवाष्ण फराळाला आली होती,मी नुकतीच पुण्याहून नाशकात घरी पोचत होते,आई ताट वाढत होत्या.त्यांच्या गोड़ आवाजात , अगं आलीस का ग? मधून आता तुझा आयुर्वेदिक उपदेश सुरु नको करुस इशारा मला कळला होता, म्हणून मी लगेच काय म्हणताय काकू ?म्हणून सवाष्णिकडे वळले.
घरी कधीहि आलेली कोणीही व्यक्ती, तिला चार शब्द प्रेमाचे आणि ४ घास मनापासून केलेल्या अन्नाचे मिळायलाच हवे हा त्यांचा जीवनमंत्र आहे. अगं उपासाची सवाष्ण असली म्हणून काय,एक दोन पदार्थ वाढायचे का ताटात असा त्यांचा उद्देश असतो. सकाळी लवकर उठून अतिशय निरनिराळे चविष्ट उपासाचे पदार्थ बनवून भरगच्च थाळी सवाष्णीसामोर असते.सवाष्ण घरी निघाली तेंव्हा दोन पाचकचुर्णाच्या पुड्या त्यांच्या हातावर ठेवून मग पाया पडावे ,अशी जाम इच्छा झाली होती पण अर्थातच ती आवरती घेतली. असो .
उद्या महाशिवरात्र बेत काय मग ??? ……
उपासाचं आध्यात्मिक महत्व हा वेगळा विषय परंतु पोटाला आराम मिळून , पोटातील अग्नी निर्दोष होऊन तोच शरीरातील इतर वाढलेल्या दोषांना पचवतो आणि शरीराची प्रतिकारशक्ती वाढवतो असे लंघनाचे (उपासाचे) थोडक्यात महत्व सांगता येईल. योग्य रीतीने केलेले लंघन व्याधी कमी करण्यास आणि आरोग्य वाढवण्यास अग्रगण्य मानले जाते. लंघनावर एक संपूर्ण लेख लवकरच लिहीन तूर्त उद्या उपासाच्या नावाखाली पोटावर अन्याय होऊ नये म्हणून काही मुद्दे
१.उपास असताना काही न खाणे अपेक्षित असते परंतु ते अव्यवहार्य असल्यामुळे उपासाला हलके आणि काही विशिष्ट पदार्थ कमी प्रमाणात पोटाला फक्त आधार म्हणून खावे.
२.डाळिंब ,मोसंबी, पपई ,केळी, ताजे अंजीर, काळ्या मनुका, काळे खजूर यांचा समावेश करावा. बाहेरचा साखरेचा भडीमार केलेला जूस पेक्षा वरील फळे चावून खावीत
३.पिण्याचे पाणी कोमट ठेवा ,भरपूर ताजे गोड़ ताक सैंधव घालून पिण्यात असू द्या.
४.लाल भोपळ्याचे सार, लाल भोपळ्याची भाजीचा बटाट्या ऐवजी वापर करावा
५. राजगिरा लाही ताक घालून अथवा दूध घालून खावी पचायला हलकी आणि पित्त वाढू देत नाही.
६.चहा कॉफी ऐवजी दूध सुंठ पावडर घालून घ्यावे.
७. केळीचे शिकरण करण्याऐवजी केळी चे बारीक काप करून त्यात १/२ चमचा मध ,२ चमचा तूप,वेलची जायफळ पावडर घालून खावे .
८. बटाटा चिप्स,साबुदाणा चिवडा इत्यादी तळलेलं पदार्थ खाण्यापेक्षा रताळ्याचा फोडणीचा तिखटामिठाचा किस , राजगिरा लाहीचा तुपाची जिरे फोडणी दिलेला चिवडा खावा. किंवा अगदी एखाद दुसरी राजगिरा पिठाची तिखटाची पुरी देखील चालू शकेल.
९. विकतची मलाई बर्फी किंवा इतर गोड़ उपासाचे पदार्थ खाण्यापेक्षा रताळ्याचे गोड़ गुळातले काप, सुकामेव्याचा लाडू,चिक्की ह्या पदार्थाना प्राध्यान द्या.
१०. शेंगदाणे ऐवजी ओले खोबरे वापरले तर पित्तIचा त्रास असणाऱ्यांची ऍसिडिटी वाढणार नाही.
११. icecream , फ्रुटसॅलड ,मिल्कशेक आवर्जून टाळावे.
यादी अजूनही खूप वाढू शकते परंतु उपासाला कमी खाणे हा नियम लक्षात ठेवून इथेच थांबूयात . वरील सगळे पदार्थ हे उदाहरणादाखल दिलेले आहेत .उपासाला हे सगळे एका दिवशी खा असा याचा मुळीच अर्थ नाही. यातील जे शक्य,आपापली पचनशक्ती,भूक याचा अंदाज घेऊन खा.
उपासतील चविष्ट पण त्रासदायक पदार्थ वगळून वरील साधे,शरीराला उपकारक आणि चवीलाही उत्तम असे पदार्थ खाण्यात आले तर उपास खऱ्या अर्थाने सफल होईल .
वरील पदार्थ सर्वसामान्य निरोगी लोकांसाठी आहेत . मधुमेही अथवा इतर विशिष्ट्य आहार सुरु असलेल्यानी आधी सल्ला घ्यावा. मधुमेही लोकांनी अर्थातच गुळ साखर घातलेल्या पदार्थांपासून दूर राहा हे वेगळे सांगायला नको.
उपासावरिल विस्तृत लेख wordpress वर मागे लिहिला होता त्याची लिंक देत आहे नक्की वाचा

Fast: Official leave to feast and rest to stomoch

वैद्य रुपाली पानसे
आद्यं आयुर्वेद , पुणे
9623448798
rupali.panse@gmail.com
drrupalipanse.wordpress.com
( लेख आवडल्यास मूळ लेखात फेरफार न करता तसेच लेखिकेच्या नाव व इतर माहितीसह पोस्ट अथवा शेअर करावा. आपल्या या कृतीने काढलेला वेळ आणि वापरलेली बुद्धी सत्कारणी लागेल)

Share this :

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart